झाशीची राणी लक्ष्मीबाई- १८५७च्या लढ्यातील वीरांगना

by डिसेंबर 18, 2023

प्रस्तावना

“झाशी की राणी” अशी ओळख असलेल्या राणी लक्ष्मीबाई या भारतीय इतिहासामध्ये कुशल शासक आणि निष्ठावंत देशभक्त म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे खरे नाव माणिकर्णिका तांबे होते, परंतु इतिहासात त्या “झाशीच्या राणी लक्ष्मीबाई” या नावाने प्रसिद्ध आहेत.

स्त्री म्हणजे चूल आणि मुल असे मानणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीत माणिकर्णिकाने बदल केला. जगामधील झालेल्या युद्धांमध्ये स्त्री सहभागी झाल्या अशा मोजक्या उदाहरणांमध्ये राणी लक्ष्मीबाईंचे नाव येते. शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात त्यांचा पाठीला लहान मूल बांधून लढतानाचे चित्र किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा पुतळा कधीच पाहिला नसेल तर नवलच.

असे म्हणतात कि, फक्त प्रयत्न करणे आपल्या हातात असते, यश-अपयश देणे भगवंताच्या हातात असते. लक्ष्मीबाईंनी यश-अपयशाची पर्वा न करता प्रामाणिकपणे स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. या लेखात आपण त्यांच्या याच प्रयत्नांबद्दल माहिती घेणार आहोत.

पार्श्वभूमी

इ. स. १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या लढाईनंतर मराठा शक्ती क्षीण झाली. त्यानंतर, ब्रिटिश राजसत्तेने भारतामध्ये पाय रोवले. ब्रिटिश राजसत्तेपुर्वी जवळपास ५० वर्षे अजिंक्य असलेले मराठेदेखील ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन होते.

शनिवारवाडा हे स्थान मराठा साम्राज्य आणि त्यांच्या लष्करी तळाचे असलेले ठिकाणही ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेले.

त्यामुळे पेशवे बाजीराव दुसरे यांना शरणागती पत्करल्यानंतर वाराणसीला जावे लागले. चिमाजी अप्पा हे पेशव्यांचे लहान भाऊ होते.

मोरोपंत तांबे हे चिमाजी अप्पा यांचे जवळचे मित्र होते. तसेच, मोरोपंत हे पेशव्यांचे राजकीय सल्लागार आणि प्रशासकीय सहकारी होते. त्यांनी पेशव्यांच्या चांगल्या आणि वाईट काळात त्यांच्याबरोबर राहून त्यांना नेहमी मदत केली.

राणी लक्ष्मीबाई
राजमहालातील पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून हातात तलवार घेत राणी लक्ष्मीबाई यांची पोर्ट्रेट चित्रकारी.
स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धात त्या मोठ्या क्रांतिकारी होत्या. त्यांच्या पराक्रम, धैर्य आणि दृढनिश्चयासाठी त्यांना स्मरण केले जाते.

संक्षिप्त माहिती

माहिती
तपशील
ओळख
लक्ष्मीबाई या ब्रिटिशकालीन महान क्रांतिकारक होत्या. त्यांनी ब्रिटिशांविरोधात तीन वेळेस लढा दिला.
शेवटच्या लढ्यात त्या सर्व भारतीय क्रांतीकारक आणि स्वातंत्र्यसेनानी यांना एकत्र आणण्यास असफल झाल्या.
या लढाईत अपुरा शस्त्रसाठा, आणि सैन्यबळाच्या कमतरतेने त्यांचा पराभव झाला. याच लढाईत लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाल्याचे समजते.
लक्षणीय कामगिरी
इंग्रज सरकारविरोधी तीन युद्धात भाग घेत कडक संघर्ष केला.
नावे
लग्नाआधीचे नाव: माणिकर्णिका तांबे, लग्नानंतरचे नाव: लक्ष्मीबाई
जन्म
वाराणसी येथे १९ नोव्हेंबर १८३५ रोजी
पालक
माता: भगीरथीबाई, पिता: मोरोपंत तांबे
विवाह
१८४२ साली झाशी संस्थांचे राजे गंगाधरराव नेवाळकर
मुले
दामोदरराव, आनंदराव (दत्तक)
मृत्यू
१८ जुन, १८५८ साली ग्वालियार, मध्यप्रदेश येथे

जन्म

वाराणसीला असताना मोरोपंत आणि भगीरथीबाई यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. मोरोपंतांनी त्यांच्या या कन्येचे नाव “माणिकर्णिका” असे ठेवले.

माणिकर्णिका म्हणजे रत्नजडित कर्णभूषण असा होतो. माणिकर्णिकाला घरी मनू या नावाने संबोधत. यादरम्यान, वाराणसीला असतानाच चिमाजी अप्पांचे अकस्मात निधन झाले.

त्यानंतर पेशवे हे उत्तरप्रदेशमधील बिथूरला गेले. पेशव्यांच्या तेथील जहागिरीच्या कामात सहकार्यासाठी मोरोपंतदेखील बिथूरला रवाना झाले.

बालपण

मानिणीकर्णिकांचे बालपण पेशव्यांच्या महालातच गेले. तात्या टोपे आणि पेशव्यांचा (दत्तक) मुलगा नाना साहेब हे माणिकर्णिकाचे लहानपणापासूनचे मित्र होते.

माणिकर्णिका तिच्या लहानपनापासून खेळाडू वृत्तीची आणि धाडशी स्वभावाची होती. त्यामुळे, पेशवे तिला “छबिली” असे म्हणत.

मोरोपंतांनी बालपणापासून माणिकर्णिकाला छत्रपती शिवराय आणि त्यांच्या विषयीच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या. तसेच देशभक्ती आणि स्वतंत्रतेचे महत्व पटवून सांगितले.

त्या काळी, लोक मुलींना शिक्षण देत नव्हते. पण, मनूला लिहिण्या-वाचण्याची आवड होती. एवढेच नव्हे तर तिला तलवारबाजी, मल्लखांब आणि घौदौड यांसारख्या खेळांमध्ये ती अग्रेसर होती.

झाशीचे महाराज गंगाधररावांबरोबर विवाह

रघूनाथ हरी नेवाळकर यांच्या पेशव्यांकडून झांशीवर नेमणूक झाली त्यावेळपासूनचा हा झांशीमधील मराठा नेवाळकर राजवंश इंग्रज राजवटीसमोर तग धरून उभा होता. इंग्रज शासनाने जरी झांशी ताब्यात घेतली असली तरी येथील राज्यकारभार नेवाळकर यांच्याच अधीन होता.

माणिकर्णिकाचा मे १८४२ रोजी झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी तिचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर झाशीच्या राजघराण्यातील परंपरेनुसार माणिकर्णिकांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले.

वैवाहिक जीवन

राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा
१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील त्यांच्या योगदानाचा सम्मान करण्यासाठी मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा हा अश्वारूढ पुतळा बनवला गेला.

लक्ष्मीबाईंची वैवाहिक जीवनाचे सुरुवातीचे काही वर्षे आनंददायी होते, परंतु त्यानंतर मात्र त्यांना अनेक दुःखांचा सामना करावा लागला.

पुत्र दामोदरचा जन्म आणि अकाली मृत्यू

सन १८५१ मध्ये गंगाधरराव आणि लक्ष्मीबाईंना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. या मुलाचे नाव त्यांनी दामोदर असे ठेवले. पण मुलाचे अकाली निधन झाले.

मुलाच्या अकाली निधनानंतर गंगाधररावांनी चुलत भावाचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेतले. पुत्राच्या स्मरणार्थ महाराजांनी आनंदरावांचे दामोदरराव असे नाव ठेवले.

व्यक्तिमत्व

विष्णू भट्ट गोडसे या मराठी लेखकाप्रमाणे राणी लक्ष्मीबाई यांना स्टिपलचेस (घोड्यावरील शर्यत) ची आवड होती. तसेच, त्यांना नाश्त्याआधी रोज पहाटे व्यायाम करण्याची सवय होती.

त्यांच्या व्यक्तित्वामध्ये साधे राहणीमान आणि त्यावर शोभेल अशी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि नम्र स्वभाव त्यांना इतर स्त्रियांपासून वेगळे करायचा.

छंद आणि आवड

लग्नानंतरही लक्ष्मीबाईंना घुडसवारीची आवड होती. त्यांच्या राजमहालाच्या आवारात पागा होता, ज्यामध्ये, जातिवंत घोडे होते. त्यामधील पावन, सारंगी, बादल हे घोडे राणी लक्ष्मीबाईंना विशेष प्रिय होते.

काहींचा असा विश्वास आहे की, या घोड्यांमधील बादलने किल्ल्यावरून उडी मारून राणी लक्ष्मीबाईंना शत्रूंपासून सुरक्षित किल्ल्याबाहेर काढले होते.

डॉक्टरीन ऑफ लापसीच्या धोरणाला प्रखर विरोध

महाराज गंगाधररावांचा नोव्हेंबर १८५३ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर, गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने दामोदरराव हे दत्तक पुत्र असल्याने झाशीच्या गादीवरील हक्क अमान्य केला.

राणी लक्ष्मीबाईंचे चित्र
झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे व्यक्तिमत्त्व दर्शवणारे चित्र

लॉर्ड डलहौसीने डॉक्टरीन ऑफ लापसीचे धोरण लागू केले. याची सूचना जेव्हा लक्ष्मीबाईंना दिली तेव्हा लक्ष्मीबाई रागाने ओरडल्या,

मैं मेरी झाँसी नही दूंगी!

– राणी लक्ष्मीबाई

लक्ष्मीबाईंची शब्दांनी संपूर्ण दरबारात शांतता पसरली. मार्च १८५४ साली, लक्ष्मीबाईंना ब्रिटिश फर्मानांतर्गत वार्षिक ६०,००० रुपये पेन्शन घेऊन, राजमहाल आणि किल्ला सोडावा लागला. लक्ष्मीबाई झाशीमध्ये राहूनच पुढील उठावाची तयारी करू लागल्या.

१८५७ च्या उठावामागील राणी लक्ष्मीबाईंची पार्श्वभूमी

या उठावाची सुरवात मिरटमध्ये १० मे १८५७ साली झाली. कॅप्टन अलेक्सन्डर स्केने याला लक्ष्मीबाईंनी स्वसंरक्षणाकरिता सैन्याची तुकडी पाठवण्यास सांगितले.

इकडे शहरामध्ये ब्रिटिश हे भ्याड असून त्यांच्यापासून भिण्याची गरज नाही अशी प्रेरणा देण्यासाठी लक्ष्मीबाई हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करतात. ज्या मध्ये झाशीतील सर्व महिला सामील झाल्या होत्या.

बंडखोरांकडून स्टार फोर्ट येथे ब्रिटिश अधिकाऱ्यांची कत्तल

या क्षणापर्यंत, ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याच्या विचारावर राणी लक्ष्मीबाई नाखूष होत्या. १८५७ च्या जूनमध्ये बंगालच्या स्थानिक पायदळाचे बंडखोरांनी ब्रिटिशनचा स्टार फोर्ट नावाचा किल्ला ताब्यात घेतला.

तेथील खजिना आणि दारुगोळा लुटून, ब्रिटिश अधिकाऱ्यांना हत्यारे टाकण्यास सांगून त्यांच्या पत्नी आणि मुलांसह त्यांची हत्या करण्यात आली. ब्रिटिश आर्मी डॉक्टर थॉमस लोवे यांच्या मते राणी लक्ष्मीबाईंचाही या हत्याकांडात समावेश होता.

शेवटी, राणी लक्ष्मीबाईंनाही अशाप्रकारे बदनाम करण्याची संधी कसे बरे सोडतील?

लक्ष्मीबाईंकडून झाशीच्या गादीचे संरक्षण

असो, यानंतर त्या बंडखोरांनी लक्ष्मीबाईंकडून खंडणी गोळा केली आणि राजमहाल उडवण्याची धमकी दिली.

त्यानंतर सौगोर डिव्हिजनचे कंमिशनर मेजर एर्स्कीने याला पत्र लिहून लक्ष्मीबाईंनी घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. उत्तरामध्ये एर्स्कीने त्यांना ब्रिटिश सरकारतर्फे नवीन संचालक येईपर्यंत शहराची व्यवस्था सांभाळण्यास सांगितली.

त्यानंतर, झाशीच्या सैन्याने लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली राजकुमार आणि प्रतिस्पर्धी गंगाधररावांचा भाचा यांच्यात संघर्ष झाला. झाशीची गादी काबीज करण्याचा शत्रूचा हा प्रयत्न अपयशी ठरला.

इंग्रजांच्या मनमानी कारभाराविरुद्ध राणीने झाशीला वाचवण्यासाठी क्रांतीकारकांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली. राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश सैन्याविरुद्ध अनेक योजना आखल्या आणि त्यांच्या हयातीत तीन युद्धे लढली.

झाशीच्या लढाईपूर्वी भारतातील क्रांती मोर्चे आणि बंड

शेवटच्या मुघल सम्राटाची बेगम झीनत महल, नाना साहेबांचा वकील अजीमुल्ला, शहागढचा राजा, तात्या टोपे, नवाब वाजिद अली शाहची बेगम हजरत महल, खुद्द मुघल सम्राट बहादूर शाह, वानपूरचा राजा मर्दन सिंग, इत्यादी. भारतातील अशा सर्व महत्त्वाच्या लोकांनी राणी लक्ष्मीबाईंना मदत करण्याचा प्रयत्न केला.

झाशीच्या लढाईपूर्वीही मेरठ आणि कानपूरमध्ये मोठा बंड झाला. ४ मे, १८५७ रोजी कानपूरमध्ये मोठा बंड झाला. इ. स. १८५७ मध्ये मेरठमध्ये झालेल्या या बंडाची सुरुवात विकिपीडियानुसार, १० मे, तर वेबदुनियानुसार, ७ मे या दिवशी झाली.

इंग्रजांनी शाहगढ, सागर, गडकोटा, वानपूर, तालबेहट, मडखेडा आणि मदनपूर अशी अनेक ठिकाणे ताब्यात घेतली आणि बंडखोरांची अतिशय निर्दयी हत्या केली. या छोट्या बंडानंतर ब्रिटीश सैन्याने कैमासन टेकडीजवळ आपला तळ ठोकला.

झाशीच्या किल्ल्यावरील आक्रमण

जानेवारी १८५८ मध्ये झाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्यदल पाठवत असल्याची ब्रिटिश सरकारने घोषणा केली. परंतु, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे सल्लागारांना ब्रिटिशांच्या सत्तेपासून स्वतंत्रता मिळवाची इच्छा होती.

तसेच इंग्रज सैन्याला यायला विलंब लागल्याने, राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढला. तसेच या वेळेमध्ये झाशीच्या सैन्याने दारुगोळा आणि चांगल्या तोफा यांचा चांगला बंदोबस्त केला.

ब्रिटिश जनरल ह्यूग रोज यांच्याविरुद्ध राणी लक्ष्मीबाईंचे बंड

शेवटी मार्चच्या महिन्यात इंग्रज सैन्य झाशीमध्ये पोचले. झाशीच्या किल्ल्यावरील संरक्षण व्यवस्था वाढल्याचे पाहून जनरल ह्यूग रोज यांनी राणी लक्ष्मीबाईंची शरणागती पत्करण्यास सांगितले, अन्यथा सर्वत्र विध्वंस होईल. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी विचार करून लढण्याचा निर्धार केला.

लक्ष्मीबाई म्हटल्या की,

“आम्ही स्वातंत्र्यासाठी लढू, विजय जर आमचा झाला, तर स्वातंत्र्याची चव आम्हाला कळेल, आणि जर पराभव झाला, तर रणभूमीत प्राण देऊन आमच्या आत्म्याला गती मिळेल”. राणी लक्ष्मीबाईंनी स्वतः झाशीच्या बचावाचे नेतृत्व हाती घेतले.”

– राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीणबाईंचे ब्रिटिशांविरुद्धचे पहिले युद्ध

झाशीच्या किल्ल्यावरील कडक बिजली नावाची तोफ
झाशीच्या किल्ल्यावरील कडक बिजली नावाची लोकप्रिय तोफ जी पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात वापरण्यात आली होती.

२४ मार्च, १८५८ पासून किल्ल्यावर इंग्लिश तोफांचा भडीमार सुरु झाला. राणीच्या पक्षाकडूनही भारी प्रमाणात तोफा डागण्यात आल्या.

झाशीच्या सैन्याने एका रात्रीत पडलेल्या भिंतींची दुरुस्ती केली. तसेच राणींनी त्यांचे लहानपणीचे मित्र तोट्या टोपे यांची मदत मागितली. तात्या टोपेंनी २०,००० सैन्य पाठवले.

परंतु ते झाशीला वाचण्यात अपयशी ठरले. इंग्रजांनी शेवटी २ एप्रिल, १८५८ रोजी झाशीच्या किल्ल्याच्या भिंती पडल्या आणि सैन्याच्या दोन तुकड्या किल्ल्यात शिरल्या. राजवाडा आणि बाहेर प्रत्येक ठिकाणी प्रखर विरोध झाला.

राणी लक्ष्मीबाई किल्ल्यातून सुखरूप बाहेर

यादरम्यान राणी त्यांचा घोडा बादलला घेऊन किल्ल्यावरून उडी मारली, त्यावेळी घोड्याचा मृत्यू झाला. नंतर, एका सैनिकांच्या तुकडीबरोबर त्या तात्या टोपेंच्या इंग्रजांविरोधी बंडखोर सैन्याला जाऊन मिळाल्या.

राणीच्या नेतृत्वामध्ये कालपी हे शहर ताभ्यांत घेऊन त्याच्या चांगल्या बचावाची तयारी केली. ब्रिटिश सैन्याने २२ मे ला पुन्हा आक्रमण केले. यावेळी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतः नेतृत्व केले. परंतु, दुर्दैवाने पुन्हा लक्ष्मीबाईंच्या सैन्याचा पराभव होतो.

ग्वालीयारच्या किल्ल्यातून लक्ष्मीबाई यांचा अखेरचा संघर्ष

ग्वालियरच्या किल्ल्याची अप्रतिम रचना

ग्वालियरच्या किल्ल्याची अप्रतिम दर्शनी संरचनेचे छायाचित्र.

काळानुसार गडाचे राज्यकर्ते बदलतात, पण ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या या किल्याच्या भिंती पूर्वीसारख्याच उभ्या आहेत. हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून राणी लक्ष्मीबाईंनी त्यांची शेवटची लढाई आणि १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध देखील लढले.

त्यानंतर, राणी लक्ष्मीबाई, नवाब बंडा, तात्या टोपे आणि राव साहेब यांच्यासमवेत ग्वालियारच्या किल्ल्याला सैन्यतळ केले. थेतील सर्व सैन्याच्या सहमतीने नाना साहेबांना पेशवा घोषित केले.

भारतातील इतर बंडखोरांना एकत्र करून ग्वालियारच्या किल्याला इंग्रजांविरुद्ध वापरण्याचा राणी लक्ष्मीबाईंचा प्रयत्न विफल झाला. इतर बंडखोर राजी न झाल्याने ब्रिटिशविरोधी सैन्याच्या कमतरतेमुळे पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला.

मृत्यू

हा आणखी एक विवादास्पद विषय आहे. ब्रिटिश रेकॉर्ड्सप्रमाणे त्यांचा मृत्यू हा पिस्तूलद्वारे गोळी लागल्याने झाला. तर दुसऱ्या मान्यतेप्रमाणे, राणी लक्ष्मीबाईंनी ख्रिस्ती साधूंना त्यांच्या शरीराला जिवंतपणी अग्नी देण्यास सांगितले होते.

उद्धरण

प्रतिमांचे श्रेय

१. लक्ष्मीबाईंचा हातात तलवार धरून फूल बाग, ग्वालियरमधील असलेला अश्वरूढ पुतळा, वैशिष्ट्यीकृत छायाचित्राचे श्रेय: गॅलरीस्त्रोत: ब्रिटिश ग्रंथालय

२. लक्ष्मीबाईंचे साडीमधील चित्र, श्रेय: दी लॉस्ट गॅलरी, स्त्रोत: फ्लिकर

३. लाला दिन दयाळ यांनी इ. स. १८८२ मध्ये काढलेले झाशीच्या किल्ल्याचे छायाचित्र, श्रेय: लाला दिन दयाळ, स्त्रोत: विकिपीडिया

४. ग्वालियरचा किल्ला, श्रेय: उदित शर्मास्त्रोत: विकिपीडिया

५. ग्वालियर येथील लक्षमीबाईंची समाधीस्थळ, श्रेय: ज्ञानेंद्र चौहान, स्त्रोत: पॅनोरॅमिओ, आरकाइव्ह

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest